मुख्य सामग्रीवर वगळा

विनाशकाले विपरीत बुद्धी...

उगवतीचे रंग

विनाशकाले विपरीत बुद्धी...

सध्या लॉकडाऊन सुरु आहे. तुम्ही आम्ही घरी बसून आहोत. सध्या दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत या एके काळी लोकप्रिय असलेल्या धारावाहिक पुन्हा दाखवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत रामायण आणि महाभारतातील काही साम्यस्थळे माझ्या डोळ्यासमोर येतात.  रामायणात मंथरा आणि महाभारतात शकुनी हे खल, दुष्ट आणि कुटील प्रवृत्तीचे प्रतिनिधी आहेत. ते आपली खेळी खेळली आहेत. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की ज्यांच्यासाठी त्यांनी ही खेळी खेळली ती पात्रं त्यांच्या या खेळीला बळी पडली आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मंथरा आणि शकुनी हे आपल्या कुटील कारस्थानात यशस्वी झाले आहेत.

 कैकयी तशी मुळात  चांगली. रामावर स्वतःच्या मुलासारखे प्रेम करणारी. पण मंथरेच्या जाळ्यात ती अडकते. आणि पुत्रमोहाने दशरथाकडून दोन वर मागून घेते. जो प्रजेचा अतिशय लाडका, आणि तिचाही अतिशय लाडका अशा रामाला ती वनवासात पाठवते. पुढे हीच अत्यंत साधी, प्रेमळ असणारी कैकयी इतकी कठोर होते की राम , लक्ष्मण, सीता यांच्या अंगावरील राजवस्त्रे, दागिने काढून घेण्यात तिला यत्किंचितही लाज वाटत नाही.

ज्याच्या डोळ्यावर माया, मोह आदी विकारांचा पडदा आहे, त्याला कोणीही हिताच्या चार गोष्टी सांगितल्या तरी आवडत नाहीत. किंबहुना अशी आपल्या हिताचा उपदेश करणारी व्यक्ती त्याला आपला शत्रूच वाटते.  पण अशा लोकांच्या हाती शेवटी पश्चातापाशिवाय काहीही उरत नाही. तीच गट शेवटी कैकयीची झाली. धृतराष्ट्राची झाली आणि शेवटी सर्वशक्तिमान असलेला रावणही त्याच गतीला प्राप्त झाला.

धृतराष्ट्राला त्याची पत्नी गांधारीसह, विदुर, पितामह भीष्म, श्रीकृष्ण आदी मंडळी त्याच्या हिताचे सांगण्याचा प्रयत्न करतात. धर्मानुसार योग्य गोष्ट कोणती आणि अयोग्य कोणती हे सांगतात. परंतु, पुत्रमोहाने अंध झालेल्या धृतराष्ट्राला जागे करण्यात ते सगळे अयशस्वी होतात. शकुनी सारखी कुटील कारस्थानी आहे हे माहिती असूनही त्याला हस्तिनापूरमधून घालवून देण्याचे किंवा चार शब्द सुनावण्याचे धैर्य कोणीही दाखवत नाही. धर्म म्हणजे काय, धर्माने कोणती गोष्ट न्याय्य आहे हे कैकयी, धृतराष्ट्र, दुर्योधन आणि रावण या सगळ्यांना कळत नव्हते असे नाही. पण जेव्हा स्वार्थाचा, मायामोहाचा पडदा डोळ्यावर येतो, तेव्हा हितकारक गोष्टी अहितकारक वाटू लागतात. कोणी दोन शब्द चांगले सांगितले तर ती व्यक्ती शत्रू वाटू लागते.

रावण हा सर्वशक्तिमान. देवांनाही बंदी बनवणारा. पराक्रमी, विद्वान वगैरे. त्याला विशेषणे लावावी तेवढी कमी पडतील. थोडक्यात म्हणजे त्या काळातील तो महापुरुष आहे. बडी हस्ती. रावणासारखे असे पुष्कळ महापुरुष प्रत्येक काळात आढळतात. आजही आढळतील. फक्त राहणीमानात आणि वागण्याबोलण्यात फरक काळानुसार पडला असेल. पण प्रवृत्ती तीच. त्या काळात रामही महापुरुष होता. मग राम आणि रावण या दोन्ही महापुरुषांच्या मध्ये असा कोणता फरक होता की ज्यामुळे एक जगाला वंदनीय झाला आणि दुसरा तिरस्करणीय. तर त्यांच्यातला फरक हा की रामजवळ सात्विकता होती, तो धर्मानुसार आचरण करणारा होता, शीलवान होता, वडीलधारे आणि गुरुजनांचा आदर करणारा होता. रावणाजवळ इतर सगळे गुण होते. पण रामजवळ असलेल्या या गुणांपैकी एकही नव्हता.

रावणाला सगळ्यांनी किती परोपरीने समजावून सांगितले ! सर्वात आधी मंदोदरी. तिने परोपरीने समजावून सांगितले. मंदोदरी सारखे रत्न रावणाला पूर्वपुण्याईने लाभले. मंदोदरी ही अत्यंत पतिव्रता स्त्री होती. त्यामुळे ज्या  प्रातःस्मरणीय आणि वंदनीय अशा पाच पतिव्रता आहेत, त्यामध्ये मंदोदरी आहे. पण रावणाला तिची किंमत नाही. मंदोदरी ही रावणाची केवळ पत्नी नाही, तर त्याच्या मुलांची आई देखील आहे. म्हणून या दोन्ही भूमिकेतून तिने रावणाला समजावून सांगितले आहे. नंतर रावणाला त्याच्या हिताचा उपदेश करणाऱ्यांमध्ये त्याचा सख्खा भाऊ बिभीषण आहे. दोघेही सहोदर. पण दोघांच्या वृत्तीत किती अंतर आहे बघा. एक सात्विक प्रवृत्तीचा आहे, रामभक्त आहे. तर दुसरा काम, क्रोध मद यांचा मूर्तिमंत पुतळा. नंतर हनुमान, अंगद आणि रावणाच्या दरबारातील काही मंत्री आणि नात्यातील काही व्यक्ती एवढे सगळे त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात.

पण विनाशकाले विपरीत बुद्धी. रामचरितमानस मध्ये एक श्लोक आहे. तो मंदोदरीच्या तोंडी आहे. ती म्हणते

काल दंड गहि काहु न मारा ! हरइ धर्म बल बुद्धी बिचारा !

निकट काल जेहि आवत साई ! तेहि भ्रम होइ तुम्हारीहि नाई  !!

' काळ काठी घेऊन कोणाला मारीत नाही. तो धर्म, बुद्धी, बल आणि विचार यांचे हरण करतो. हे स्वामी ! ज्याचा काळ ( मरण ) निकट येतो त्याला आपल्या प्रमाणेच भ्रम होतो. '

म्हणतात ना काळाचा मार किंवा काठी दिसत नाही. तसेच रावणाचे झाले आहे. पुढे अंगदाने त्याला परोपरीने समजावले. त्याच्या तोंडी असलेले रामचरितमानस मधले दोन श्लोक मला आवडले. परंतु मी फक्त त्याचा अर्थ या ठिकाणी देतो आहे. अंगद म्हणतो मी तुझ्यासारख्याला मारून, तुझ्या सेनेचा संहार करून, तुझी लंका नष्ट करून सीताजींना घेऊन जाईन . आणि असे केले तरी काही गैर नाही . पण मी तुला आता मारीत नाही. त्याचे कारण तो फार छान सांगतो

वाममार्गी, कंजूष, कामी , अत्यंत मूढ, अति दरिद्री, बदनाम, अत्यंत म्हातारा, सदा आजारी, नेहमी क्रोधयुक्त राहणारा, भगवान विष्णूशी विन्मुख झालेला, वेद आणि संतांचा विरोधी , आपलेच शरीरपोषण करणारा, दुसऱ्यांची निंदा करणारा, आणि पापांची खाण म्हणजे महान पापी हे चौदा गुणलक्षण असलेले प्राणी जिवंत असूनही मेल्याप्रमाणेच आहेत.

अंगदाने वर्णन केलेले हे चौदा गुणलक्षण आपणही एकदा विचार करावा असे आहेत. म्हणून या ठिकाणी मी त्यांचा उल्लेख केला.

रावणासारखे लोक आपल्याबरोबरच आपल्या राष्ट्राला, आपल्या प्रजाजनांना, आपल्या नातेवाईकांना विनाशेच्या गर्तेत घेऊन जातात. असे लोक सत्तास्थानी असणे हे त्या राष्ट्राचे दुर्दैव असते. असे लोक लंकेसारख्या सोन्याच्या राष्ट्राचा सुद्धा विनाश करतात. आणि सोन्यासारख्या गोष्टींची माती करतात.

 तर ज्या रामाला तो सारखा वनवासी, मानव म्हणून हिणवतो, तो राम सद्गुणांची खाण आहे. हनुमान, अंगद यांच्यासारखे महापराक्रमी, बुद्धिमान सेवक, सुग्रीवसारखा मित्र आणि त्यांची सगळीच  सेना राम देव म्हणून त्याच्या बरोबर आलेली नाही. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. राम हा आपले वचन पाळणारा, शरणागताला आश्रय देणारा होतो. सज्जनांना अभय देणारा होता. म्हणून तो सगळ्यांना प्रिय होता.

रावणासारख्या असुर प्रवृत्तीच्या विरोधात तो आपले धनुष्य घेऊन उभा आहे. अशा वीरांची साथ देवही देतो. असेच लोक नराचा नारायण होतात. प्रातःस्मरणीय होतात. वंदनीय होतात. ही धरती, ही मायभूमी अशाच सुपुत्रांची अपेक्षा करीत असते. अशी माणसे युगानुयुगे तुमच्या आमच्या मनावर राज्य करत राहतात. राज्य करीत राहतील.

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
               ९४०३७४९९३२
-----------------------------------------------------
' शिका,संघटित व्हा, संघर्ष करा ' हा मंत्र देऊन मरगळलेल्या मनामनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग जागविणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. भारतीय लोकशाहीचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा तेव्हा बाबासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय कोणालाही पुढे जाता येणार नाही. या महामानवाला विनम्र अभिवादन.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...