मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग चांदण्या रात्रींचे गारुड ...

उगवतीचे रंग

चांदण्या रात्रींचे गारुड ...

 चांदण्यांनी भरलेलं आकाश कोणाला मोहवीत नाही ? अगदी लहानथोर कवींपासून ते थोर तत्वज्ञांपर्यंत. वेदमंत्र लिहिणाऱ्या ऋषीमुनींपासून ते ग्रहगोलांचा शोध घेणाऱ्या आजच्या शास्त्रज्ञांपर्यंत. लहानपणी आकाशातला चंद्र पाहून रामाने सुद्धा चंद्र हवा म्हणून हट्ट केला होता. प्रेषित महंमद पैगंबरांना चांदण्या रात्रींनी स्फूर्ती दिली. तर रवींद्रनाथ टागोरांसारखा महाकवी आकाशाखाली आपले देहभान विसरून जायचा. चित्रपट काम करणाऱ्या कलाकारांनाही आपण तारे आणि तारका म्हणतो. आणि लहान मुलांच्या रूपाने  हे ' तारे जमीपर ' येतात. म्हणून एखादी आई आपल्या लाडक्याला म्हणते

चंदा है तू मेरा सुरज है तू
ओ  मेरी आँखों का तारा है तू

पौर्णिमेचा चंद्र पाहून समुद्राला सुद्धा भरती येते. आणि प्रेमी जनांची प्रीत देखील फुलते. तिला जणू उधाण येतं . बकुळ पंडित यांनी गायिलेलं 

उगवला चंद्र पुनवेचा
मम हृदयी दर्या उसळला प्रीतीचा

हे नाट्यगीत कोणाचे मन मोहून घेत नाही ? अनेकदा तर प्रियकराला आपल्या प्रेयसीच्या मुखाला चंद्राची उपमा द्यावीशी वाटते. एका जुन्या हिंदी गाण्यात प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो

एक रात मी दो दो चांद खिले
एक घुंघट मे , एक बदली मे 

 सुरेश भट यांच्या गझल माझ्या फार आवडत्या. त्यांच्या काही गझल आशा भोसलेंनी गायल्या आहेत. त्यांचे सोने झाले आहे.आकाश कधी कोणाला उचलून नेता येईल का ? पण कवीने मनात आणले तर सहज शक्य आहे.  ' केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली ' ही अशीच एक भटांची अप्रतिम गझल. या गझलेतली एक ओळ मला फार आवडते. ' आकाश तारकांचे उचलून रात्र गेली. ' ही ती ओळ. शब्दातलं सौंदर्य बघा.  कधी असतं ' आकाश तारकांचं ?  तर रात्री. कोण घेऊन येतं तर ती रात्र आपल्यासोबत घेऊन येते. मग हे तारकांनी भरलेले आकाश तीच भल्या पहाटे उचलून घेऊन जाते.  किती सुंदर कल्पना.  आणि या गझलेतली शेवटची ओळ तर अप्रतिम आहे. 

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली. 

ती नक्षत्रांनी भरलेली रात्र एवढी सुंदर आहे, की ती कवीला त्याची शेवटची ओळ सुचवून जाते. अशीच चांदण्यांनी भरलेली रात्र असलेली एक अप्रतिम गझल.

 ' चांदण्यात फिरताना माझा धरलास हात, 
 सखया रे आवर ही ,सावर ही चांदरात.

अशा चांदण्या रात्रीत आपल्या संख्याबरोबर, जिवलगाबरोबर फिरण्याची मजा काही वेगळीच.

शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत, घेऊनि कवेत साजणा झुलव मला.

अशी एकामागून एक सुंदर गाणी आठवत जातात. उंबरठा चित्रपटातलं लतादीदींनी असंच गायिलेलं ' चांद मातला , मातला त्याला कशी आवरू ' हे गाणं एक वेगळीच अनुभूती देऊन जातं . चांदण्या रात्रीचा मुलामा जणू आपल्या मनावर देऊन जातं . तर सुधीर फडकेंनी गायिलेल्या चंद्र आहे साक्षीला या गाण्याची खुमारी काही औरच. गाण्याची सुरवातच किती छान होते.

' पान जागे, फुल जागे, भाव नयनी जागला
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षीला.

तर बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांनीच गायिलेलं ' तोच चंद्रमा नभात ' हे गाणं एक वेगळाच मूड जागवत. तोच पौर्णिमेचा चंद्र आहे. तीच चैत्रातली रात्र आहे. पण सगळे जरी तेच असले तरी आज परिस्थिती बदलली आहे. पूर्वीची प्रीत हातात राहिली नाही ही खंत कवीला आहे.
म्हणून या गाण्याला थोडी दुःखाची किनार आहे.

सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे?
मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे?
ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी

अशी ही सगळी अवीट गोडीची गाणी. कितीही ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी. 

कलाकार, कवी यांची प्रतिभा नेहमीच आकाशाला गवसणी घालत असते. कविवर्य बा भ बोरकर आकाशाबद्दल फार सुंदर शब्द वापरतात. ते आकाशाला माऊलीच्या रूपात पाहताना म्हणतात

कोर बिलोरी तुझ्या कपाळी , शिरी मोत्यांची जाळी ग
तुझ्या लोचनी मुक्तात्म्यांची शाश्वत नित्य दिवाळी ग 

आकाश म्हणजे जणू माऊली . तिच्या कपाळावरची बिलोरी कोर म्हणजे चंद्र. शिरी असलेली मोत्यांची जाळी म्हणजे तारका आणि नक्षत्रे. कायम चंद्र आणि सूर्य यांच्यासारखे तेजस्वी दीप आणि नक्षत्रांचे दिवे. जणू कायम दिवाळीच. किती सुंदर कल्पना. अशा कल्पनांनी कवी अवघे आकाशच आपल्या कवेत घेतो. कुसुमाग्रज आपल्या एका कवितेत पहाट झाली हे किती सुंदर शब्दात सांगतात

काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत .

अशा या आकाश आणि चांदण्याच्या रूपाने तुम्हा आम्हाला सगळ्यांना युगानुयुगे मोहिनी घातली आहे. आकाशात गेलेल्या अंतराळवीरांना आपला भारत ' सारे जहाँसे अच्छा ' दिसतो. तर सावरकरांची देशभक्ती आकाशातले तारे पाहून उचंबळून येते. आपल्या ' सागरा प्राण तळमळला ' या कवितेत ते म्हणतात

नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा
मज भरत भूमीचा तारा.

 ©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
     9403749932 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...