मुख्य सामग्रीवर वगळा

कोण कुणाजवळून शिकलं ... ?

उगवतीचे रंग

कोण कुणाजवळून शिकलं ... ?

माझ्या शिक्षकी पेशात अनेक विद्यार्थ्यांशी माझा संबंध आला. त्यातील काही आपल्या वैशिट्यपूर्ण गुणांमुळे किंवा स्वभाववैशिष्ट्यांमुळे माझ्या लक्षात राहिले आहेत. खरं तर माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो. आणि असावा. मी मुलांना शिकवलं असं वाटत असताना मुलांनी सुद्धा माझं अनुभवविश्व आणि भावविश्व समृद्ध आणि संपन्न केलं आहे. माझं शिक्षकपण हे त्यांच्यामुळे होतं . माझ्यातला शिक्षक घडत गेला तो विद्यार्थ्यांमुळे. आणि माझ्यातल्या विद्यार्थी घडत गेला तो माझ्या शिक्षकांमुळे. त्यांनी कसं शिकायचं हे मला शिकवलं. खरा शिक्षक तोच असतो की जो आपल्या विद्यार्थ्यांना कसं शिकायचं हे शिकवतो. त्यांना ज्ञानाचे पंख देऊन त्या पंखांच्या जोरावर ज्ञानाच्या क्षेत्रात अजून उंच भरारी घेण्यास प्रवृत्त करतो.

आपल्यापैकी काही माणसे नियमितपणे ज्ञानेश्वरी, गीता यासारखे ग्रंथ वाचणारी असतील.काहींची तर अनेक पारायणे या ग्रंथांची झाली असतील. पण गंमत अशी की दर वेळेस हे ग्रंथ वाचताना काही ओळींचा अर्थ आपल्याला नव्याने उलगडतो. तो आधी वाचताना लक्षात आलेला नसतो. मग पुन्हा वाचता वाचता तो अचानक ' क्लिक ' होतो. ' क्लिक ' हा शब्द मी येथे मुद्दाम वापरला आहे. क्लिक होतं म्हणजे काय जसा एखादा दिवा क्षणात चमकून जावा, तसा हा अर्थ मनासमोर लक्खकन प्रकट होतो. आणि त्या वेळी होणारा जो आनंद असतो, तो अवर्णनीय असतो.

झालं असं की मी विद्यार्थी शिक्षकाच्या संबंधावर एक कथा वाचत होतो. मूळ कथा इंग्रजी आहे. पण मला ती खूप आवडली म्हणून ती येथे मी थोडक्यात देणार आहे. त्या कथेतलं एक वाक्य मला आधीच्या वाचनात नीटसं कळलं नाही. पण नंतर मात्र ' क्लिक ' झालं. ते पण ओघात सांगणार आहे.

एक शाळेतला पाचव्या इयत्तेचा एक वर्ग. त्या वर्गावर शिकवण्यासाठी एक नवीन शिक्षिका येतात. वर्गात सगळी श्रीमंतांची, चांगल्या घरातील मुले. व्यवस्थित पोशाख वगैरे केलेली. त्या बाई येतात आणि वर्गाला उद्देशून म्हणतात, ' I  love you all the same and equally.  मला तुम्ही सगळेच सारखे आवडतात. पण बाईंना माहिती असतं की आपण खोटं बोलतोय. कारण त्यांच्या समोरच्या बाकावर एक गबाळ्या पद्धतीने पोशाख केलेला, अव्यवस्थित असा टेडी नावाचा एक विद्यार्थी बसलेला असतो. पण तरीही दररोज शाळा सुरु होताना त्या आपल्या मुलांसमोर हे वाक्य बोलत राहतात. वर्षभरात त्या शाळेत विविध परीक्षा होतात. वर्गातील सर्व विद्यार्थी त्या परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करीत असताना, हा मुलगा मात्र सर्वांच्या मागे पडतो. बाई त्याच्या पेपरवर लाल रंगाची मोठी फुली मारत, मोठा गोल मार्कांच्या रूपात त्याच्या पेपरवर ठेवतात.

त्या शाळेत अशी पद्धत असते की सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागील वर्षांच्या शैक्षणिक नोंदींचा आढावा घ्यायचा. आणि त्या तुलनेत या वर्षी कुठे आहे हे पाहायचे. तसा आढावा त्या घेत असताना, त्या मुलाच्या मागील नोंदी त्या बघतात. त्यात त्याच्या पहिलीच्या शिक्षकांनी लिहिलेलं असतं की टेडी हा अत्यंत हुशार आणि चुणचुणीत मुलगा. तो वर्गात असणं सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट असते. दुसऱ्या वर्गाच्या शिक्षकांनी लिहिलेलं असतं की हा वर्गातील एक हुशार आणि व्यवस्थित विद्यार्थी आहे. त्याच्या तिसऱ्या वर्गाच्या शिक्षकांनी लिहिलेलं असतं की त्याच्या आईच्या निधनाचा त्याला मोठा धक्का बसला आहे. वडील त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. त्याच्यासाठी काहीतरी करणं आवश्यक आहे. चौथ्या वर्गाचे शिक्षक लिहितात, ' तो आता फारसा बोलत नाही. शाळेत त्याला रस वाटत नाही. त्याला आता फारसे मित्रही नाहीत. आणि तो वर्गात काही वेळा झोपतो. '

हे सगळे वाचल्यावर त्या विद्यार्थ्यांची परिस्थिती त्या बाईंच्या लक्षात येते. आपल्या स्वतःच्या वागण्याबद्दल त्या ओशाळतात. नंतर ख्रिसमसचा सण येतो. सगळी मुलं शाळेत बाईंसाठी भेट घेऊन येतात. त्यांनी आणलेल्या भेटवस्तू किमती असतात. आकर्षक रंगीबेरंगी गुळगुळीत कागदात गुंडाळलेल्या असतात. हा मुलगा मात्र वाण्याकडून आणलेल्या वस्तूंच्या खाकी पेपरमध्ये काही भेटवस्तू गुंडाळून आणतो. बाई त्याचे प्रेझेन्ट उघडून पाहतात. सगळी मुले हसतात. त्या खाकी कागदात एक रंगीबेरंगी मणी असलेलं एक ब्रेसलेट असतं . त्याचे काही मणी तुटलेले असतात. आणि एक पाव भाग उरलेली सेंटची बाटली असते. त्या ते ब्रेसलेट आपल्या हातात घालतात. आणि त्या बाटलीतलं थोडं अत्तर आपल्या हातावर लावतात.  शाळा सुटल्यावर सगळी मुलं निघून जातात. टेडी मात्र थांबतो. तो बाईंना म्हणतो, ' माझी आई हा सेंट लावायची ना, त्यावेळी तिच्या अंगाला यायचा अगदी तसाच वास तुमच्या अंगाला येतो आहे. '

मुलं गेली. टेडी पण निघून गेलेला असतो. बाईंच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात. पुढे त्या कथेत असं एक वाक्य आहे की जे मला दुसऱ्यांदा वाचल्यावर त्याचा अर्थ काय असावा हे क्लिक झालं. वाक्य असं आहे

On that very day, she quit teaching reading, and writing , and arithmetic. Instead , she began to teach children .

वरील वाक्य तसं साधंच आहे पण त्यात मोठा अर्थ भरला आहे. त्यांनी वाचन, लेखन गणित शिकवणं सोडलं. त्याऐवजी त्या ' शिकवू ' लागल्या. या  ठिकाणी दुसऱ्या वाक्यातल्या teaching या शब्दाला नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळा आणि व्यापक अर्थ आहे. म्हणजे आपल्या मुलांना समजून घ्यायला त्यांनी सुरुवात केली. एकवेळ वाचन, लेखन, गणित इ विषय मुलांना नाही शिकवले तरी चालतील. पण त्यांना समजून घेऊन त्यांच्यावर संस्कार करणे, त्यांचा भावनिक विकास करणे जास्त महत्वाचे आहे. असा अर्थ या वाक्यातून ध्वनित होतो.

पुढे तो मुलगा  त्यांच्या लक्ष देण्यामुळे हळूहळू पूर्वपदावर आला. लवकरच त्याने हुशार मुलांमध्ये आपले स्थान निश्चित केले. पुढच्या वर्गात तो जात राहिला. पण दरवर्षी त्या बाईंना त्याचे एक पत्र यायचं. त्या पत्रात त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख असायचा. आणि दरवेळी न चुकता तो एक वाक्य लिहायचा, ' तुम्ही अजूनही माझ्या आवडत्या शिक्षक आहात .' पुढे तो मुलगा पदवीधर झाला. आणखी शिकला. नंतर त्याच्यामागे डॉ म्हणून पदवी लागली. मग एक दिवशी त्याचं बाईंना नेहमीप्रमाणे पत्र आलं. त्यात म्हटलं होतं, ' मॅडम, नुकतंच माझं एका मुलीशी लग्न ठरलं आहे. माझे वडील दोन वर्षांपूर्वीच वारले. आता माझ्या लग्नाच्या वेळी माझ्या आईवडिलांपैकी कोणी असणार नाही. पण लग्नाच्या कार्यक्रमात माझ्या आईच्या जागी तुम्ही बसाल का ? '

अर्थातच त्या बाईंनी ही गोष्ट मान्य केली. त्या दिवशी त्या लग्नाला उपस्थित राहिल्या. त्यांनी हातात ती काही मणी तुटलेली  बांगडी घातली होती. आणि टेडीला आवडणारा परफ्युम लावून त्या आल्या होत्या. त्यांनी एकमेकांना प्रेमभराने मिठी मारली. टेडी बाईंच्या कानात हळूच म्हणाला, ' मी तुमचा खूप आभारी आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात. माझ्यातलं स्वत्व जागं केलंत . मी काही करू शकतो असा विश्वास मला दिलात. त्यामुळे मी आज इथपर्यंत येऊ शकलो. '

त्या बाई अश्रुपूर्ण नेत्रांनी टेडीला म्हणाल्या, ' तू चुकतो आहेस. तो तूच आहेस की ज्याने मी काही करू शकते असा विश्वास मला दिला. तुला भेटल्यानंतरच मला कसं शिकवायचं हे कळलं. '

धन्य त्या बाई आणि तो टेडीसुद्धा. कोण कुणाजवळून शिकलं ? असं म्हणावं लागेल की दोघे एकमेकांकडून...!

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
            ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...