उगवतीचे रंग
सुरुवात मुळापासून करावी लागेल...
एका मोठ्या शहरातील एक प्रसिद्ध शाळा. शाळेत सगळी गर्भश्रीमंतांची मुले. प्रत्येकजण आपापल्या गाडीतून येणार. या शाळेत शिक्षण किती मिळते हा भाग वेगळा. पण श्रीमंतीची आणि वैभवाची चिन्हे अंगाखांद्यावर मिरवणारी शाळा आणि विद्यार्थी सुद्धा. अशा या शाळेत एकदा एक पाहुणे गेले. त्यांनी आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना त्या मुलांनी जी उत्तरे दिली, ती ऐकून ते पाहुणे अक्षरशः अंतर्मुख झाले. त्यांनी मुलांना पहिला प्रश्न विचारला, ' तुम्हाला मोठे होऊन काय बनावेसे वाटते ? '
एक मुलगा म्हणाला, ' आम्हाला खूप मोठे व्हायचे आहे. '
' हो, पण मोठे म्हणजे काय ? '
' मोठे म्हणजे श्रीमंत. खूप पैसा कमवायचा आणि जीवनातील आनंदाचा उपभोग घ्यायचा. '
' तुम्हाला पुढे आपल्या आईवडिलांसाठी काय करावेसे वाटते ? '
' त्यांच्यासाठी काय करणार ? आणखी पैसा कमावणार. आम्ही शाळेत येतो, तेव्हा ते उठलेले नसतात. घरातील नोकर येऊन आम्हाला उठवतो. घरातील बाई आम्हाला नाश्ता, जेवण देते. आम्ही शाळेतून घरी जातो तेव्हा ते घरी नसतात. रात्री उशिरा घरी येतात. त्यामुळे मोठेपणी आमच्याकडे भरपूर पैसा आला की आम्ही आईवडिलांची सेवा करण्यासाठी चार नोकर ठेवू. शकू.'
पाहुणे पुढे विचारतात. ' तुम्हाला तुमच्या शिक्षकांसाठी काही करावेसे वाटते का ? '
मुलगा म्हणतो, ' त्यांच्यासाठी काय करणार ? आमचे शिक्षक गाडीतून येतात. पुस्तकातून शिकवतात. प्रश्न विचारू देत नाहीत. त्यांनी शिकवलेलेच आम्ही पाठ करायचे आणि परीक्षेत लिहायचे. '
ही घटना सत्य आहे आणि पाहुण्यांनी विचारलेले वरील प्रश्न साधेच आहेत. पण त्या प्रश्नांची जी उत्तरे मुलांनी दिली, ती तुम्हा आम्हा सर्वांना अंतर्मुख करणारी आहेत. आजची शिक्षणपद्धती, शाळा, समाज आणि आजूबाजूचे वातावरण आम्हाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे याची चुणूक या उत्तरातून दिसते. सगळ्या शाळा आणि सगळी मुले अशी नसली तरी, आज त्यांच्या विचारांचा ओघ ज्या दिशेने वाहतो आहे तो चिंताजनक आहे. आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे भौतिक समृद्धी आली आहे. पण मानवतेच्या शाश्वत मूल्यांची पीछेहाट झाली आहे.
एखाद इमारत बांधताना आपण आधी इमारतीची भक्कम पायाभरणी करतो. मुले ही राष्ट्राची भावी नागरिक आहेत. ती चांगली नागरिक व्हावीत, चांगली माणसे त्यांच्यातून घडवीत, यासाठी त्यांची पायाभरणी उत्तम व्हायला हवी.या शाळेबद्दल विचार करत असताना नकळत रवींद्रनाथ टागोरांची निसर्गाच्या सान्निध्यात भरणारी शांतिनिकेतन शाळा डोळ्यांसमोर आली.
पण याबाबत त्या मुलांना दोष देऊन आपल्याला मोकळे होता येणार नाही. दोष आपलाच आहे. आपण त्या मुलांना अनुकूल वातावरण देऊ शकलो नाही. ज्या जमिनीत आपण बी पेरतो, ती जमीन शेतकरी आधी अनुकूल करून घेतो. शेतीची मशागत करतो. त्यातील काडीकचरा, तण काढून टाकतो. आणि मगच पेरणी करतो. पीक वाढत असताना तो त्याच्याकडे लक्ष ठेवून असतो. त्या पिकाला नीट खत , पाणी मिळेल याची व्यवस्था करतो. रोग पडू नये म्हणून जंतुनाशक औषधांची फवारणी करतो. एवढी सगळी काळजी घेतो त्या पिकाची. पोटाच्या पोरासारखी. तेव्हा कुठे हंगाम चांगला जातो. इंग्रजीत एक म्हण आहे, Reap as you sow . '
आम्हालाही त्या शेतकऱ्याचा आदर्श समोर ठेवावा लागेल. तो पिकासाठी जसे योग्य वातावरण निर्माण करतो, तसेच आम्हाला आमच्या मुलांसाठी करावे लागेल. अनुकूल विचारांचे खत , पाणी देऊन त्यांना वाढवावे लागेल. वाईट विचारांचे तण वाढणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. वाईट संगत , वाईट विचार यांचा रोग पडू नये म्हणून चांगल्या संस्कारांची वेळोवेळी फवारणी करावी लागेल.
आज रामायण, महाभारतासारख्या मालिका आम्ही पाहत आहोत. त्यात आईवडील, गुरूंची आज्ञा पाळणे, त्यांचा मान ठेवणे, त्यांची सेवा करणे या गोष्टी वेळोवेळी दाखवल्या जातात. या मालिका मूल्यशिक्षणाचा वस्तुपाठ आहेत. त्या फक्त बघायच्या नसतात. त्यातील जीवनमूल्ये आजही आचरणात आणण्याजोगी आहेत. या मालिका पाहताना आपल्या मुलांसोबत बसावे. त्यांना त्या काळजीपूर्वक बघायला सांगावे. मालिका संपल्यानंतर आजच्या भागात तुम्ही काय पाहिले ? त्यातून तुम्ही काय शिकलात ? असं सहज गप्पा मारता मारता विचारावे. प्रसंगी त्यांना आपल्याला आवडलेले विचार लिहिण्यास सांगावे. आज दिशाहीन आणि मूल्य हरवत चाललेल्या उगवत्या पिढीला मार्गावर आणण्यासाठी आम्हाला पुन्हा आमच्या भारतीय संस्कृती आणि परंपरांकडे वळावे लागेल. कधीतरी मुलांसोबत आपली आवडती प्रार्थना किंवा स्तोत्र म्हणायला एकत्र बसावे. त्याचा अर्थ त्यांना सांगावं. पसायदान ही तर एक सुंदर वैश्विक प्रार्थना आहे. रॅम शेवळकरांनी त्याच्यावर फार सुंदर निरूपण केले आहे. तेही उपलब्ध आहे. ते कधीतरी आपण ऐका आणि मुलांनाही ऐकवा.
मुले हुशार असतात. फक्त आपण त्यांना बोलके केले पाहिजे. त्यांना व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे. मुलांशी संवाद साधल्याने तुम्ही मुलांच्या अधिक जवळ जाऊ शकाल. आईवडील हे आपले मित्र आहेत. त्यांच्याजवळ आपण आपले विचार, भावना व्यक्त करू शकतो असा विश्वास मुलांमध्ये या निमित्ताने आपण निर्माण करू शकलो तर त्यासारखी दुसरी गोष्ट नाही. आईवडील होणे सोपे आहे. सुजाण पालक होणं कठीण आहे. मुलं आपल्या वागण्याचं पण निरीक्षण करीत असतात. आणि निरीक्षणातून अनुकरण करीत असतात.
नुसता कोरडा उपदेश करून मुलं ऐकतील असं जर आपल्याला वाटत असेल, तर ते चुकीचं आहे. आपल्याला सुरुवात मुळापासून करावी लागेल. आपल्यापासून करावी लागेल. मग आपण पालक असू नाहीतर शिक्षक असू.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२
सुरुवात मुळापासून करावी लागेल...
एका मोठ्या शहरातील एक प्रसिद्ध शाळा. शाळेत सगळी गर्भश्रीमंतांची मुले. प्रत्येकजण आपापल्या गाडीतून येणार. या शाळेत शिक्षण किती मिळते हा भाग वेगळा. पण श्रीमंतीची आणि वैभवाची चिन्हे अंगाखांद्यावर मिरवणारी शाळा आणि विद्यार्थी सुद्धा. अशा या शाळेत एकदा एक पाहुणे गेले. त्यांनी आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना त्या मुलांनी जी उत्तरे दिली, ती ऐकून ते पाहुणे अक्षरशः अंतर्मुख झाले. त्यांनी मुलांना पहिला प्रश्न विचारला, ' तुम्हाला मोठे होऊन काय बनावेसे वाटते ? '
एक मुलगा म्हणाला, ' आम्हाला खूप मोठे व्हायचे आहे. '
' हो, पण मोठे म्हणजे काय ? '
' मोठे म्हणजे श्रीमंत. खूप पैसा कमवायचा आणि जीवनातील आनंदाचा उपभोग घ्यायचा. '
' तुम्हाला पुढे आपल्या आईवडिलांसाठी काय करावेसे वाटते ? '
' त्यांच्यासाठी काय करणार ? आणखी पैसा कमावणार. आम्ही शाळेत येतो, तेव्हा ते उठलेले नसतात. घरातील नोकर येऊन आम्हाला उठवतो. घरातील बाई आम्हाला नाश्ता, जेवण देते. आम्ही शाळेतून घरी जातो तेव्हा ते घरी नसतात. रात्री उशिरा घरी येतात. त्यामुळे मोठेपणी आमच्याकडे भरपूर पैसा आला की आम्ही आईवडिलांची सेवा करण्यासाठी चार नोकर ठेवू. शकू.'
पाहुणे पुढे विचारतात. ' तुम्हाला तुमच्या शिक्षकांसाठी काही करावेसे वाटते का ? '
मुलगा म्हणतो, ' त्यांच्यासाठी काय करणार ? आमचे शिक्षक गाडीतून येतात. पुस्तकातून शिकवतात. प्रश्न विचारू देत नाहीत. त्यांनी शिकवलेलेच आम्ही पाठ करायचे आणि परीक्षेत लिहायचे. '
ही घटना सत्य आहे आणि पाहुण्यांनी विचारलेले वरील प्रश्न साधेच आहेत. पण त्या प्रश्नांची जी उत्तरे मुलांनी दिली, ती तुम्हा आम्हा सर्वांना अंतर्मुख करणारी आहेत. आजची शिक्षणपद्धती, शाळा, समाज आणि आजूबाजूचे वातावरण आम्हाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे याची चुणूक या उत्तरातून दिसते. सगळ्या शाळा आणि सगळी मुले अशी नसली तरी, आज त्यांच्या विचारांचा ओघ ज्या दिशेने वाहतो आहे तो चिंताजनक आहे. आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे भौतिक समृद्धी आली आहे. पण मानवतेच्या शाश्वत मूल्यांची पीछेहाट झाली आहे.
एखाद इमारत बांधताना आपण आधी इमारतीची भक्कम पायाभरणी करतो. मुले ही राष्ट्राची भावी नागरिक आहेत. ती चांगली नागरिक व्हावीत, चांगली माणसे त्यांच्यातून घडवीत, यासाठी त्यांची पायाभरणी उत्तम व्हायला हवी.या शाळेबद्दल विचार करत असताना नकळत रवींद्रनाथ टागोरांची निसर्गाच्या सान्निध्यात भरणारी शांतिनिकेतन शाळा डोळ्यांसमोर आली.
पण याबाबत त्या मुलांना दोष देऊन आपल्याला मोकळे होता येणार नाही. दोष आपलाच आहे. आपण त्या मुलांना अनुकूल वातावरण देऊ शकलो नाही. ज्या जमिनीत आपण बी पेरतो, ती जमीन शेतकरी आधी अनुकूल करून घेतो. शेतीची मशागत करतो. त्यातील काडीकचरा, तण काढून टाकतो. आणि मगच पेरणी करतो. पीक वाढत असताना तो त्याच्याकडे लक्ष ठेवून असतो. त्या पिकाला नीट खत , पाणी मिळेल याची व्यवस्था करतो. रोग पडू नये म्हणून जंतुनाशक औषधांची फवारणी करतो. एवढी सगळी काळजी घेतो त्या पिकाची. पोटाच्या पोरासारखी. तेव्हा कुठे हंगाम चांगला जातो. इंग्रजीत एक म्हण आहे, Reap as you sow . '
आम्हालाही त्या शेतकऱ्याचा आदर्श समोर ठेवावा लागेल. तो पिकासाठी जसे योग्य वातावरण निर्माण करतो, तसेच आम्हाला आमच्या मुलांसाठी करावे लागेल. अनुकूल विचारांचे खत , पाणी देऊन त्यांना वाढवावे लागेल. वाईट विचारांचे तण वाढणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. वाईट संगत , वाईट विचार यांचा रोग पडू नये म्हणून चांगल्या संस्कारांची वेळोवेळी फवारणी करावी लागेल.
आज रामायण, महाभारतासारख्या मालिका आम्ही पाहत आहोत. त्यात आईवडील, गुरूंची आज्ञा पाळणे, त्यांचा मान ठेवणे, त्यांची सेवा करणे या गोष्टी वेळोवेळी दाखवल्या जातात. या मालिका मूल्यशिक्षणाचा वस्तुपाठ आहेत. त्या फक्त बघायच्या नसतात. त्यातील जीवनमूल्ये आजही आचरणात आणण्याजोगी आहेत. या मालिका पाहताना आपल्या मुलांसोबत बसावे. त्यांना त्या काळजीपूर्वक बघायला सांगावे. मालिका संपल्यानंतर आजच्या भागात तुम्ही काय पाहिले ? त्यातून तुम्ही काय शिकलात ? असं सहज गप्पा मारता मारता विचारावे. प्रसंगी त्यांना आपल्याला आवडलेले विचार लिहिण्यास सांगावे. आज दिशाहीन आणि मूल्य हरवत चाललेल्या उगवत्या पिढीला मार्गावर आणण्यासाठी आम्हाला पुन्हा आमच्या भारतीय संस्कृती आणि परंपरांकडे वळावे लागेल. कधीतरी मुलांसोबत आपली आवडती प्रार्थना किंवा स्तोत्र म्हणायला एकत्र बसावे. त्याचा अर्थ त्यांना सांगावं. पसायदान ही तर एक सुंदर वैश्विक प्रार्थना आहे. रॅम शेवळकरांनी त्याच्यावर फार सुंदर निरूपण केले आहे. तेही उपलब्ध आहे. ते कधीतरी आपण ऐका आणि मुलांनाही ऐकवा.
मुले हुशार असतात. फक्त आपण त्यांना बोलके केले पाहिजे. त्यांना व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे. मुलांशी संवाद साधल्याने तुम्ही मुलांच्या अधिक जवळ जाऊ शकाल. आईवडील हे आपले मित्र आहेत. त्यांच्याजवळ आपण आपले विचार, भावना व्यक्त करू शकतो असा विश्वास मुलांमध्ये या निमित्ताने आपण निर्माण करू शकलो तर त्यासारखी दुसरी गोष्ट नाही. आईवडील होणे सोपे आहे. सुजाण पालक होणं कठीण आहे. मुलं आपल्या वागण्याचं पण निरीक्षण करीत असतात. आणि निरीक्षणातून अनुकरण करीत असतात.
नुसता कोरडा उपदेश करून मुलं ऐकतील असं जर आपल्याला वाटत असेल, तर ते चुकीचं आहे. आपल्याला सुरुवात मुळापासून करावी लागेल. आपल्यापासून करावी लागेल. मग आपण पालक असू नाहीतर शिक्षक असू.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा