मुख्य सामग्रीवर वगळा

किस्से साहित्यिकांचे...

उगवतीचे रंग

किस्से साहित्यिकांचे...

उगवतीचे रंग रोज झाले सुरु
चला म्हटलं आज त्यात
थोडे हास्यरंग भरू.

निरनिराळ्या साहित्यिकांचे साहित्य जसे आपल्याला आवडते, तसेच  वेळप्रसंगी त्यांच्या भाषणातून, संभाषणातून निर्माण झालेले विनोदही आपल्याला आवडतात. त्यातून त्यांची विनोदबुद्धी, प्रसंगावधानता आणि चातुर्य या गुणांचे दर्शन होते. त्यातून ते कधी समोरच्याची विकेट घेतात, कधी समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करतात तर कधी सभा जिंकून घेतात. बिरबलाच्या चातुर्यकथा जशा प्रसिद्ध आहेत, तसेच आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, राम गणेश गडकरी इ चे किस्सेही प्रसिद्ध आहेत. पणआपण नेहमी ऐकले आहेत, त्यापेक्षा थोडे वेगळे किस्से आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

य गो जोशी हे कथाकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या वहिनीच्या बांगड्या, शेवग्याच्या शेंगा इ कथा प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे साहित्यिकांचे नेहमी येणेजाणे सुरु असायचे. एकदा त्यांच्याकडे त्या काळातले प्रसिद्ध कवी आणि विडंबनकार ज के उपाध्ये त्यांना भेटण्यासाठी आले होते. पण काही कामानिमित्त य गो बाहेर गेले होते. तेव्हा त्यांनी यगोंच्या पत्नीजवळ निरोप ठेवला आणि त्यांना उपाध्ये येऊन गेले म्हणून सांगा असे सांगितले.

यगो घरी आल्यानंतर त्यांच्या पत्नीने कोणी पाध्ये म्हणून येऊन गेल्याचे सांगितले. यगोंनी बरेच आठवण्याचा प्रयत्न केला पण पाध्ये आडनावाचे कोण येऊन गेले असतील ते काही त्यांच्या लक्षात येईना. दुसऱ्या दिवशी परत  उपाध्ये त्यांना भेटण्यासाठी आले. तेव्हा यगो घरीच होते. उपाध्ये म्हणाले, ' काल मी येऊन गेल्याचे वहिनींनी तुम्हाला सांगितलेच असेल. ' तेव्हा यगो म्हणाले, ' अच्छा, तुम्ही आला होतात होय ? मला पाध्ये येऊन गेल्याचे सांगितले गेले. '

तेव्हा हजरजबाबी उपाध्ये चटकन म्हणाले, ' उ ' वहिनींच्या डोक्यात राहिली .  '

प्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई आणि यशवंतराव चव्हाण यांची घनिष्ठ मैत्री होती. एकदा यशवंतरावांनी ते दोघे निवांत असताना रणजित देसाईंना दमात घेऊन विचारले -

' काय रणजित, अलीकडे फार पितोस असं ऐकलंय .'

' हो, पितो दादा, पण मला त्याचा लोभ नाही. '

' काय बोलतोस, कळतं का ? '

' कळतं दादा. तुमच्यापासूनच शिकलो. '

' म्हणजे ? काय म्हणायचं तुला ? '

' म्हणजे कायम ह्या ना त्या सत्तेच्या खुर्चीवर बसून मला त्याचा लोभ नाही असं म्हणण्यासारखंच आहे ना हे ? '

यावर यशवंतराव काय बोलणार ?

एकदा मॉरिशसला दुसरी जागतिक मराठी परिषद भरली होती. या मराठी परिषदेला महाराष्ट्रातून गेलेले अनेक नामवंत साहित्यिक आणि कलावंत उपस्थित होते. त्यात लोकसत्ताचे संपादक माधव गडकरीही होते. तेव्हा माधव गडकरींनी सुधीर गाडगीळांना म्हटले, ' इथे नामवंत साहित्यिक, कलाकार उपस्थित आहेत. त्यांच्या थोडक्यात मुलाखती घेऊन टाका. ' त्यानुसार गाडगीळ मुलाखती घेण्यासाठी व्यासपीठावर गेले. त्यावेळी व्यासपीठावर गाडगीळांच्या उजवीकडे पु ल देशपांडे आणि डावीकडे प्रख्यात गायिका माणिक वर्मा बसलेल्या होत्या.

गाडगीळांनी पहिला प्रश्न माणिक वर्मांना विचारला. ' माणिक दादरकरची माणिक वर्मा होताना, तुम्हाला भावगीत किती उपयोगी पडलं ? '

माणिकबाई काही उत्तर देणार तोच पुलं म्हणाले, ' अरे, कशाला तिच्या वर्मावर घाव घालतोस ? '

हे ऐकल्याबरोबर सारं सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेलं. थोडी शांतता झाल्यावर गाडगीळ म्हणाले, ' अहो, त्यांच्या वर्मावर मी पामर काय घाव घालणार ? त्यांचा वर्मा ' अमर ' आहे. माणिक वर्मांच्या पतीचं नाव अमर आहे हे ज्यांना माहिती होतं त्यांनी या विनोदाला मनमोकळे हसून दाद दिली. अशी होती या साहित्यिक आणि कलाकारांची समयसूचकता. त्यांचा हजरजबाबीपणा आणि विनोदबुद्धी.


                               ©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
                                         ९४०३७४९९३२



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...