मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग समर्थ रामदास : निसर्गाचे गायन करणारा महाकवी

उगवतीचे रंग

समर्थ रामदास : निसर्गाचे गायन करणारा महाकवी

महाराष्ट्र ही संतांची भूमी. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ आदी संतांनी समाजाला भक्तिमार्ग तर दाखवलाच पण त्यासोबतच निसर्ग सुद्धा आपल्या रचनेतून उलगडला. वागावे कसे, भक्ती कशी करावी हे सांगताना त्या सगळ्यांनी निसर्गातील प्राणी, पशु पक्षी, नद्या आदींची उदाहरणे देऊन समजावले.त्यांच्या काव्यात निसर्ग विविध रूपात प्रकट झाला आहे.  त्यामुळे त्यांची शिकवण कधीच निरस, रटाळ किंवा कंटाळवाणी झाली नाही. आज आपण पर्यावरणाचा उद्गोष करतो, पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करतो. पण संतांना त्याचे महत्व कधीच उमगले होते. 

समर्थ रामदासांचे जेथे जेथे वास्तव्य होते, त्या सगळ्या जागा निसर्गाच्या सान्निध्यातल्या होत्या. नाशिकचे गोदातीर, टाकळी येथे केलेले पुरश्चरण, कृष्णतिरीचे कार्य, सज्जनगड किंवा समर्थानी जेथे दासबोध लिहिला ते शिवथरघळ ही सगळी ठिकाणे अतिशय निसर्गरम्य होती. आपली तपसाधना करताना हा निसर्ग समर्थांच्या दृष्टीआड कधीच झाला नाही. त्यांनी स्वतःच्या वास्तव्याचे वर्णन ' दास डोंगरी राहतो ' असेच केले आहे. समर्थ रामदासांची कोणतीही रचना घ्या. दासबोध, आरत्या, मनाचे श्लोक किंवा आणखी कोणतीही रचना. तिच्यात भक्ती, उपदेश याबरोबरच काव्यामध्ये आढळणारे पदलालित्य, साधी सोपी नादमधुर रचना आपल्या दृष्टीस पडते. समर्थ उगीच अलंकारिक भाषा वापरत नाहीत. सहज आणि ओघवती भाषा. तिला आपोआप नाद, माधुर्य, रस, रंग, गंध प्राप्त होतो. शिवथरघळीचे वर्णन करताना ते म्हणतात

 ‘गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनि चालली बळे
धबाबा लोटल्या धारा। धबाबा तोय आदळे।।’

समर्थांनी संपूर्ण भारत भ्रमण केले होते. आपल्या तीर्थयात्रेतून निसर्गाचे अवलोकन केले होते. फक्त निसर्गाचेच अवलोकन केले नाही तर विविध गावे , प्रांत तेथील लोकजीवन, चालीरीती आणि लोकांची असलेली त्यावेळची स्थिती याचेही अचूक निरीक्षण त्यांनी केले. त्यातूनच त्यांच्या पुढच्या कार्याची दिशा ठरवण्यास त्यांना मदत झाली. समर्थांना भारतभ्रमणातून, निरीक्षणातून आणि लोकांच्या बोलण्यातून वनस्पती, निसर्ग इ ची प्रचंड माहिती झाली होती. ती सगळी त्यांच्या विविध रचनांमधून आपल्याला प्रत्ययाला येते. 

त्यांची आनंदवनभुवनी ही रचना तर माझी खूप आवडती. लता मंगेशकरांनी आपल्या मधुर स्वरात तिचे सौंदर्य अधिकच वाढवले आहे. त्या रचनेतील ' उदंड जाहले पाणी, स्नानसंध्या करावया  ' या ओळी समर्थांना पाण्याची असलेली मुबलकता कशी प्रिय होती ते दाखवतात.पाण्यावरचे प्रेम रामदासांच्या वाङ्मयात अनेक ठिकाणी दिसून येते.

‘वळणें वांकाणें भोवरे। उकळ्या तरंग झरे।
लादा लाटा कातरे। ठाईं ठाईं।।
शुष्क जळाचे चळाळ । धारा धबाबे खळाळ ।
चिपळ्या चळक्या भळाळ। चपळ पाणी।।
फेण फुगे हेलावे। सैरावैरा उदक धावे।
थेंब फुई मोजावे। अणुरेणु किती।।

या ओळींमध्ये वाहत्या पाण्याचा नाद आपल्याला जाणवतो. ते वर्णन करण्यातील त्यांची सहजता आणि प्रतिभा तर अवर्णनीयच. पाण्याच्या गुणधर्माचे वर्णन करताना आपण पानी  ' तेरा रंग कैसा ' म्हणतो. समर्थ पाण्याचे गुणधर्म किती सुंदर सांगतात ते पहा 

‘येक्यासंगे तें कडवट।
येक्यासंगें तें गुळचट।
येक्यासंगे ते तिखट। तुरट क्षार।।
ज्या ज्या पदार्थास मिळे।
तेथें तद्रूपचि मिसळे।
सखोल भूमीस तुंबळे। सखोलपणें।।
विषामधें विषचि होतें।
अमृतामधें मिळोन जाते।
सुगंधीं सुगंध तें। दरुगधीं दरुगध।।
गुणीं अवगुणीं मिळे।
ज्याचें त्यापरी निवळे।
त्या उदकाचा महिमा न कळे। उदकेंविण।।’ 

पाणी म्हणजे जीवन. पण समर्थ त्याही पुढे जाऊन सांगतात- झाडेझुडपे, वृक्षवेली आदींना जे काही गुणधर्म प्राप्त झाले आहेत, तेदेखील पाण्यामुळे.
‘नाना वल्लीमधें जीवन। नाना फळीं फुलीं जीवन।
नाना कंदीं मुळीं जीवन। गुणकारकें।।
नाना यक्षुदंडाचे रस। नाना फळांचे नाना रस।
नाना प्रकारीचे गोरस। मद पारा गुळत्र।।’

पावसाळ्यातील निसर्ग जसा आपल्याला प्रिय, तसा समर्थानाही होता. पावसाळ्यातील डोंगरांचे वर्णन करताना ते म्हणतात 
     पसरले सरले गिरि साजरे |सरवटे धुकटे भरिते भरे|
     बहु वात झडांच झडाडितो | वर तरु वरताचि कडाडितो||
      या रचनेतील अनुप्रास आणि नादमाधुर्य अप्रतिम आहे. पावसाळ्यात सुंदर दिसणाऱ्या पर्वतांना ते ' पसरले गिरी साजिरे ' असे सुंदर शब्द वापरतात. तर झाडातून जोरदार वाहणाऱ्या वाऱ्याचे वर्णन त्याच्या आवाजासहित ' बहू वात झडाच झडझडतो ' या शब्दात ते करतात. तर साधकाला उपदेश करताना ते सांगतात 

पर्वती उदकापासी ! सन्निधचि एकीकडे !
फार एकांत सेवावा ! अभ्यास नित्यनूतनु !
सहावी सीतउष्णादी ! पहावी रम्य सी स्थळे ! 
वाटिका वृक्ष लावावे ! पुष्पे फळे परोपरी ! 
    
समर्थांनी बागेमध्ये कोणकोणती झाडे लावावी ते सांगितले आहे. त्यावरून त्यांचे झाडांविषयीचे ज्ञान आणि निसर्गप्रेम आपल्याला प्रत्ययाला येते. सांगितले आहे. ते सांगतात 
प्रसंग निघाला स्वभावे | बागेमध्ये काय लावावे | म्हणून घेतली नावे | काही एक || अशी करून नंतर काही एक असे म्हणताना वृक्ष, महावृक्ष, फळझाडे, पालेभाज्या, तृण, वेली, कंदमुळे, फुलझाडे इत्यादी जवळपास तीनशे वनस्पतींची नावे समर्थांनी सहजपणे घेतली आहेत. 
भोस बरू वाळा मोळा  | ऊस कास देवनळा |वेत कळकी चिवारी | असे गवताचे प्रकार एकेका ओळीत सांगितले आहेत. तर भुईचाफे नागचाफे मोगरे | पारिजातक बटमोगरे | शंखासुर काळेमोगरे | सोन तरवड सोनफुले || अशी फुलांची ऩावे एका कडव्यात घेतली आहेत. तसेच साव सिसवे सिरस कुड | कोळ कुंभा धावडा मोड | काळकुडा भुता बोकडा| कुरंडी हिरंडी लोखंडी ||  अशी जंगली झाडांची नावे देखील त्यांत आहेत.
समर्थांच्या या निसर्ग ज्ञानाबद्दल सांगावे आणि लिहावे तेवढे कमी आहे. या एका छोट्याशा लेखात समर्थ वाङ्मयातील सर्वच निसर्गाचा उल्लेख किंवा वर्णन करता येणे शक्य नाही. पण बऱ्याचदा त्यांच्यासारख्या संतांनी दाखवलेल्या या निसर्गप्रेमाकडे आपले दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. म्हणून केवळ ते आपल्या नजरेत आणण्यासाठी हा आजचा लेखन प्रपंच . अर्थात सगळ्या संतांचा मूळ हेतू शेवटी आपल्या सगळ्यांना परमार्थ मार्गाला लावणे हाच आहे. पण निसर्ग आणि पर्यावरणाची जाणीव देखील करून द्यायला ते विसरत नाहीत.
 ©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
 ९४०३७४९९३२ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...