उगवतीचे रंग...
उन्नयन : विचारांचे, भावनांचे
फार पूर्वी चीनमध्ये कन्फ्यूशियस नावाचा एक तत्वज्ञ होऊन गेला. चीनमधील तत्वज्ञानावर त्याच्या शिकवणुकीचा प्रभाव आहे. त्याची अनेक वचने प्रसिद्ध आहेत. ती मला तर सुभाषितांसारखीच वाटली. आणि आजच्या परिस्थितीतही ही कालबाह्य झालेली नाहीत. आपल्या एका वचनात तो म्हणतो, " तुम्हाला जर असे वाटले की तुम्हाला जे ध्येय साध्य करायचे ते खूप कठीण आहे, तर ते ध्येय बदलू नका. तर ते साध्य करण्याचे मार्ग किंवा पद्धत बदला. "
इतर अनेक गुरूंसारखा त्याचाही मोठा शिष्यपरिवार होता. एकदा त्याला त्याच्या एका शिष्याने प्रश्न विचारला. ' कनिष्ठ दर्जाचा माणूस त्याच्या शत्रूला किंवा विरोध करणाऱ्याला कसे मारतो ? ' कन्फ्यूशियस तत्काळ उत्तरला, ' दगडाने. ' शिष्याने पुढे विचारले की मग उच्च दर्जाचा माणूस त्याच्या विरोधकाला कसे मारतो ? यावर कन्फ्यूशियस उद्गारला, ' लेखणीने. ' तसं पाहायला गेलं तर ही उत्तरे वरवर फार साधी वाटतात. पण त्यात खोल अर्थ दडलेला आहे. कनिष्ठ माणूस म्हणजे ज्याच्या विचार, भावनांचा विकास झालेला नाही असा माणूस. तो रानटी माणसासारखा प्राथमिक अवस्थेतच असतो. आपली नैसर्गिक प्रतिक्रिया तो दगड मारून व्यक्त करतो. अशी माणसे त्या काळातच होती का ? नाही. ती आजही आहेत. ती सर्व काळात असतात. फक्त दगडाच्या ऐवजी इतर शस्त्रे त्यांच्या हाती आली आहेत. तो लगेच मारण्याची भाषा करतो. सूड घेण्याची भाषा करतो. हातघाईवर येतो. हे व्यक्तीलाही लागू होते आणि राष्ट्रालाही.
या गोष्टीतला ' उच्च दर्जाचा ' माणूस कोणाला म्हणता येईल ? तर जो शिकलेला आहे, ज्याच्यावर चांगले संस्कार झाले आहेत असा माणूस. केवळ पुस्तकी शिक्षण घेतलेला किंवा आपल्या नावामागे पदव्या लावणारी व्यक्ती येथे अपेक्षित नाही. तर अशी व्यक्ती जी आपल्या विरोधकांचा मुकाबला विचाराने करते. त्या व्यक्तीच्या लेखणीत असे सामर्थ्य असते. आपल्या विचारांच्या साहाय्याने समोरच्या व्यक्तीत बदल घडवून आणण्याची क्षमता अशा व्यक्तींमध्ये असते. स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, सावरकर, वि वा शिरवाडकर, साने गुरुजी इ च्या साहित्यात अशी ताकद आहे. या माणसांनी आपल्या विचारांनी समोरच्या व्यक्तींमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. संत साहित्यामध्ये सुद्धा अशी ताकद आहे. बऱ्याचशा संतांचा समाजाने छळ केला. बऱ्याच समाजसुधारकांचा समाजाने छळ केला. पण या सगळ्यांनी हातात दगड न उचलता, शापवाणी न उच्चारता आपल्या अमृतवाणीने लोकांचे प्रबोधनाच केले.
ही सगळी थोर माणसांची उदाहरणे आहेत. पण आपल्यातही म्हणजे सामान्यातही अशा असामान्य व्यक्ती असतातच. त्यांच्या विचारांचा, भावनांचा सुयोग्य विकास झालेला असतो. आपण ज्या वातावरणात वाढतो, शिक्षण घेतो, आपल्याला अनुभव येतात, तसतशी आपल्या विचारांची धारणा होत जाते. पण चांगले विचार असणाऱ्या लोकांच्या नेहमी संगतीत राहिल्याने, चांगले साहित्य वाचल्याने आपल्याही विचारांचे, भावनांचे उन्नयन व्हायला मदत होते. नाहीतरी इंग्रजीत म्हण आहेच ना, ' Man is known by the company he keeps .'
नुकतीच एक गोष्ट वाचनात आली . तुम्हीही कदाचित वाचली असेल. ती थोडक्यात अशी. एक नवीन लग्न झालेले जोडपे हनिमूनसाठी जात असते. उंच डोंगररांगातून त्यांची बस जात असताना मध्येच त्यांना निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी खाली उतरण्याची लहर येते. ते बस थांबवतात आणि उतरून जातात. बस पुढे निघून जाते. काही वेळ जातो न जातो तोच त्यांना कळते की ज्या बसने ते जात होते , त्या बसवर दरड कोसळली आहे. आणि गाडीतील काही प्रवासी ठार तर काही जखमी झाले आहेत.
त्या स्त्रीचा नवरा म्हणतो, ' बघ, बरं झालं आपण उतरलो. नाहीतर त्या प्रवांशांबरोबर आपलाही आज शेवट झाला असता. ' हे ऐकल्यावर ती नवपरिणिता पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणते, ' अहो, आपण बस थांबवली आणि त्यामुळे पुढे बस जाण्याची आणि दरड कोसळण्याची वेळ एक झाली. आपण ती बस थांबवली नसती, तर दरड पडण्याआधी कदाचित ती बस पुढे निघून गेली असती. आणि सगळ्यांचे प्राण वाचले असते. ' आज समाजाला गरज आहे ती अशा विचार आणि भावनांचे उन्नयन झालेल्या व्यक्तींची. खरं तर शिक्षणाचा अंतिम हेतू तोच आहे आणि असावा.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२
उन्नयन : विचारांचे, भावनांचे
फार पूर्वी चीनमध्ये कन्फ्यूशियस नावाचा एक तत्वज्ञ होऊन गेला. चीनमधील तत्वज्ञानावर त्याच्या शिकवणुकीचा प्रभाव आहे. त्याची अनेक वचने प्रसिद्ध आहेत. ती मला तर सुभाषितांसारखीच वाटली. आणि आजच्या परिस्थितीतही ही कालबाह्य झालेली नाहीत. आपल्या एका वचनात तो म्हणतो, " तुम्हाला जर असे वाटले की तुम्हाला जे ध्येय साध्य करायचे ते खूप कठीण आहे, तर ते ध्येय बदलू नका. तर ते साध्य करण्याचे मार्ग किंवा पद्धत बदला. "
इतर अनेक गुरूंसारखा त्याचाही मोठा शिष्यपरिवार होता. एकदा त्याला त्याच्या एका शिष्याने प्रश्न विचारला. ' कनिष्ठ दर्जाचा माणूस त्याच्या शत्रूला किंवा विरोध करणाऱ्याला कसे मारतो ? ' कन्फ्यूशियस तत्काळ उत्तरला, ' दगडाने. ' शिष्याने पुढे विचारले की मग उच्च दर्जाचा माणूस त्याच्या विरोधकाला कसे मारतो ? यावर कन्फ्यूशियस उद्गारला, ' लेखणीने. ' तसं पाहायला गेलं तर ही उत्तरे वरवर फार साधी वाटतात. पण त्यात खोल अर्थ दडलेला आहे. कनिष्ठ माणूस म्हणजे ज्याच्या विचार, भावनांचा विकास झालेला नाही असा माणूस. तो रानटी माणसासारखा प्राथमिक अवस्थेतच असतो. आपली नैसर्गिक प्रतिक्रिया तो दगड मारून व्यक्त करतो. अशी माणसे त्या काळातच होती का ? नाही. ती आजही आहेत. ती सर्व काळात असतात. फक्त दगडाच्या ऐवजी इतर शस्त्रे त्यांच्या हाती आली आहेत. तो लगेच मारण्याची भाषा करतो. सूड घेण्याची भाषा करतो. हातघाईवर येतो. हे व्यक्तीलाही लागू होते आणि राष्ट्रालाही.
या गोष्टीतला ' उच्च दर्जाचा ' माणूस कोणाला म्हणता येईल ? तर जो शिकलेला आहे, ज्याच्यावर चांगले संस्कार झाले आहेत असा माणूस. केवळ पुस्तकी शिक्षण घेतलेला किंवा आपल्या नावामागे पदव्या लावणारी व्यक्ती येथे अपेक्षित नाही. तर अशी व्यक्ती जी आपल्या विरोधकांचा मुकाबला विचाराने करते. त्या व्यक्तीच्या लेखणीत असे सामर्थ्य असते. आपल्या विचारांच्या साहाय्याने समोरच्या व्यक्तीत बदल घडवून आणण्याची क्षमता अशा व्यक्तींमध्ये असते. स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, सावरकर, वि वा शिरवाडकर, साने गुरुजी इ च्या साहित्यात अशी ताकद आहे. या माणसांनी आपल्या विचारांनी समोरच्या व्यक्तींमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. संत साहित्यामध्ये सुद्धा अशी ताकद आहे. बऱ्याचशा संतांचा समाजाने छळ केला. बऱ्याच समाजसुधारकांचा समाजाने छळ केला. पण या सगळ्यांनी हातात दगड न उचलता, शापवाणी न उच्चारता आपल्या अमृतवाणीने लोकांचे प्रबोधनाच केले.
ही सगळी थोर माणसांची उदाहरणे आहेत. पण आपल्यातही म्हणजे सामान्यातही अशा असामान्य व्यक्ती असतातच. त्यांच्या विचारांचा, भावनांचा सुयोग्य विकास झालेला असतो. आपण ज्या वातावरणात वाढतो, शिक्षण घेतो, आपल्याला अनुभव येतात, तसतशी आपल्या विचारांची धारणा होत जाते. पण चांगले विचार असणाऱ्या लोकांच्या नेहमी संगतीत राहिल्याने, चांगले साहित्य वाचल्याने आपल्याही विचारांचे, भावनांचे उन्नयन व्हायला मदत होते. नाहीतरी इंग्रजीत म्हण आहेच ना, ' Man is known by the company he keeps .'
नुकतीच एक गोष्ट वाचनात आली . तुम्हीही कदाचित वाचली असेल. ती थोडक्यात अशी. एक नवीन लग्न झालेले जोडपे हनिमूनसाठी जात असते. उंच डोंगररांगातून त्यांची बस जात असताना मध्येच त्यांना निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी खाली उतरण्याची लहर येते. ते बस थांबवतात आणि उतरून जातात. बस पुढे निघून जाते. काही वेळ जातो न जातो तोच त्यांना कळते की ज्या बसने ते जात होते , त्या बसवर दरड कोसळली आहे. आणि गाडीतील काही प्रवासी ठार तर काही जखमी झाले आहेत.
त्या स्त्रीचा नवरा म्हणतो, ' बघ, बरं झालं आपण उतरलो. नाहीतर त्या प्रवांशांबरोबर आपलाही आज शेवट झाला असता. ' हे ऐकल्यावर ती नवपरिणिता पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणते, ' अहो, आपण बस थांबवली आणि त्यामुळे पुढे बस जाण्याची आणि दरड कोसळण्याची वेळ एक झाली. आपण ती बस थांबवली नसती, तर दरड पडण्याआधी कदाचित ती बस पुढे निघून गेली असती. आणि सगळ्यांचे प्राण वाचले असते. ' आज समाजाला गरज आहे ती अशा विचार आणि भावनांचे उन्नयन झालेल्या व्यक्तींची. खरं तर शिक्षणाचा अंतिम हेतू तोच आहे आणि असावा.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा