मुख्य सामग्रीवर वगळा

आणि बुद्ध हसला...

उगवतीचे रंग

आणि बुद्ध हसला...

सध्या करोना व्हायरसने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर सहज मनात विचार येतो की हे एखाद्या देशाने विकसित केलेले जैविक अस्त्र तर नसावे ? कदाचित असेल किंवा नसेलही. तसे असले तरी ते बाहेर येणे अवघड आहे. पण भविष्यातील युद्धे ही समोरासमोर लढली जाण्यापेक्षा अशा पद्धतीने सुद्धा होऊ शकतील. त्याची झलक यानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळे भौतिक हानी होणार नाही. पण प्राणी, माणसे आणि पर्यावरणाची हानी होऊ शकते. आणि हे युद्ध असे असेल की ते युद्ध आहे हे समजायला वेळ लागेल. तोपर्यंत एखाद्या राष्ट्राची किंवा राष्ट्रांची अपरिमित हानी झालेली असू शकेल. आणि त्या राष्ट्रांवर ताबा मिळवणे शत्रू राष्ट्राला सहजसाध्य होईल.

भविष्यातील युद्धे ही  वेगवेगळ्या प्रकारची असू शकतील. जसे वर उल्लेख केल्याप्रमाणे जैविक युद्ध, एखाद्या देशाला आर्थिक गुलाम बनवून त्याला आपल्या अंकित करणे, पाकिस्तान जसे दहशतवादी घुसवून अनेक वर्षांपासून भारताशी छुपे युद्ध खेळतो आहे तसे युद्ध खेळणे आणि आणखी पुढचा प्रगत पर्याय असेल तो सुपर ह्यूमन्स किंवा सुपर सोल्जर्सच्या माध्यमातून युद्ध करणे. हा शेवटचा पर्याय अमेरिका, चीन किंवा रशिया यासारख्या राष्ट्रांकडून वापरला जाण्याची शक्यता जास्त आहे.

२०१२ मध्ये अमेरिकी लेखक सिमॉन कॉन्वे याची ' रॉक क्रिक पार्क ' या नावाची एक कादंबरी प्रसिद्ध झाली. या कादंबरीत सुपर ह्यूमन्स किंवा सुपर सोल्जर्सचा उल्लेख आहे. या कादंबरीच्या पुढे अनेक आवृत्या निघाल्या. आणि या कादंबरीत वर्णन केलेल्या सैनिकांच्या वर्णनावर आधारित वेगवेगळे चित्रपट आले. त्यात सोल्जर, युनिव्हर्सल सोल्जर, हल्क, कॅप्टन अमेरिका, घोस्ट इन थे शेल, आयर्न मॅन, एलिझियम यासारखे चित्रपट आहेत. या चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी, सैनिक आज आपल्याला काल्पनिक किंवा वैज्ञानिक कथा वाटू शकतात. पण भविष्यात प्रत्यक्षात येणाऱ्या गोष्टींची ही चुणूक आहे असे म्हणायला हरकत नाही.

पूर्वीच्या काळी ज्या गोष्टी आपल्याला स्वप्नवत वाटत होत्या, त्या आज प्रत्यक्षात आल्या आहेत. ध्वनीच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने जाणारी सुपरसॉनिक विमाने, बुलेट ट्रेन्स, आज माणूस चंद्रावर आणि मंगळावर पोहचला आहे. आज रोजच्या जीवनात टीव्ही, मोबाईल फोन्स पासून इतक्या अनेक गोष्टी आपण वापरतो की पूर्वी आपल्याला त्याबद्दल कोणी सांगितले असते तर आपण हसून ती गोष्ट उडवून लावली असती. पण त्या गोष्टी आज आपल्या दैनंदिन वापराचा एक भाग झाला आहेत.

' You cannot create anything out of nothing ' अर्थात शून्यातून आपण कुठलीही निर्मिती करू शकत नाही. त्यासाठी काही ना काही आधार तर असतोच. अमेरिकेतील व्हर्जिनिया आणि इतर प्रांतातील प्रयोगशाळांमध्ये अशा प्रकारचे संशोधन कडेकोट बंदोबस्तात सुरु आहे. त्या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही. वर ज्याचा उल्लेख केला आहे, त्या सिमॉन कॉन्वेला मात्र अशा प्रयोगशाळेत प्रवेश देण्यात आला आणि नंतर त्याची सुप्रसिद्ध ' रॉक क्रिक पार्क ' ही कादंबरी जन्माला आली . सामान्य सैनिकालाच सुपर सोल्जर कसे बनवता येईल यावर त्यांचे संशोधन सुरु आहे. त्यासाठी सामान्य सैनिकाच्या न्यूरल सेल्समध्ये बदल करून म्हणजेच त्याच्या मेंदूच्या निर्णयक्षमतेचा ताबा घेऊन त्यावर हुकमत  मिळवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यासाठी कदाचित त्याचे ब्रेन वॉशिंग करून त्याच्या मेंदूमध्ये एखादी चिप बसवता येईल का ज्यामुळे त्याच्या अनेक क्षमता वाढवता येतील आणि तो आपल्याला हवे तसे वागेल असे प्रयत्न होत आहेत. कोणत्याही देशाला युद्धात आपल्या सैनिकांची हानी होऊ नये असे वाटते. तांत्रिक कारणाने विमान पडले किंवा पाडले तरी चालेल, पण वैमानिक सुरक्षित राहावा अशी आपली इच्छा असते. म्हणूनच पाकिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या वैमानिक अभिनंदनला भारताने याबाबतीत पाकिस्तानशी कोणतीही तडजोड न करता परत आणले.

अशाच पद्धतीने युद्धात सुपर ह्यूमन्स लढतील आणि आपल्या सैनिकांची हानी होणार नाही यासाठी जेनेटिकली एन्हान्सड सैनिक निर्मितीच्या प्रयत्नातही अमेरिका आहे. त्यादृष्टीने त्यांचे संशोधन सुरु आहे. पण या प्रकारचे संशोधन फक्त अमेरिकेतच सुरु आहे असे समजण्याचे कारण नाही. चीनमध्ये या दृष्टीने कधीच प्रयत्न सुरु झाले आहेत. चीनमध्ये गोरिला माकडांमध्ये मानवी मेंदूतील जनुकांचे रोपं करण्यात शाश्त्रज्ञांनी यश मिळवले आहे. गोरिलांची ताकद आणि मानवी किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या साहाय्याने चीन गोरिला आर्मी तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. रशियामध्ये सुद्धा अशा प्रकारे सुपर सोल्जर्स तयार करण्याबाबत संशोधन सुरु आहे.

अशा रीतीने भविष्यातील युद्धाची दिशा अगदी वेगळी असेल. पण यात फार मोठा धोकाही आहे. हे तंत्रज्ञान मानवावरच उलटण्याचा . त्यापासून सावध राहणे आवश्यक आहे. नाहीतर माणसाची निर्मिती भस्मासुरासारखी माणसालाच नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. भारताने जेव्हा अणुस्फोट केला, तेव्हाचे सांकेतिक वाक्य होते, ' आणि बुद्ध हसला. ' तो दिवस होता १८ मे १९७४. त्या दिवशी बुद्ध पौर्णिमा होती. शिवाय त्याचा दुसरा अर्थ असा की भारताने अणुस्फोटासारखी महाविध्वंसक शक्ती शांततेसाठी आणि विकासासाठी वापरायचे ठरवले होते. आणि जेव्हा जेव्हा शांतीसाठी एखादे कार्य होते, तेव्हा तेव्हा शांतताप्रिय असणारा बुद्ध हसतो. स्मित करतो. भविष्यात निर्माण होणारे हे सुपर ह्यूमन्स किंवा सोल्जर्स मानव जातीच्या विकासासाठी किंवा कल्याणासाठीही वापरता येतील. ज्या दिवशी अशी बुद्धी होईल तो सुदिन. आणि मग पुन्हा बुद्ध हसेल.

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
          ९४०३७४९९३२



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...