मुख्य सामग्रीवर वगळा

आदतसे मजबूर...

उगवतीचे रंग

आदतसे मजबूर...

आमच्या घराच्या समोरून थोडे अंतर चालले की आपण मुख्य रस्त्यावर येतो. त्या रस्त्यावरच्या एका कोपऱ्यात एक पानाचा ठेला किंवा पान टपरी आहे.  मी लहानपणापासून तिथे गर्दी पाहत होतो. सुरुवातीला माझ्याकडे  कोणतेच वाहन नव्हते. साधी सायकलही नव्हती. पायी फिरायला आवडायचे. त्यामुळे वाहन नाही म्हणून तक्रार नव्हती. पण नकळत कधी तरी त्यांचे आकर्षण वाटायचे. मी ज्या पान टपरीचा उल्लेख करतो आहे, त्या ठिकाणी बरेच गाडीवाले थांबायचे. कोणी टू व्हीलरवाले तर कोणी फोर व्हीलरवाले. लहानपणी गाडीबद्दल असणाऱ्या नैसर्गिक कुतूहलातून मी त्यांचे निरीक्षण करायचो.

एखादा टू व्हीलरवाला आपल्या गाडीवरून रुबाबात खाली उतरायचा. त्या पानवाल्याला एकशे वीस किमाम असले काही तरी सांगायचा . तो पानवाला आपल्या ग्राहकांच्या सेवेत अत्यंत तत्पर होता. त्याने प्लॅस्टिकच्या आवरणात अगोदरच काही पुड्या रबर लावून बांधून ठेवलेल्या असायच्या. त्याच्यात आणि त्याच्या ग्राहकांत फार सामंजस्याचे वातावरण होते. कारण त्यांच्यात फारसे संभाषण होत नसायचे. नेहमीच्या परिचयाने दोघे एकमेकाला चांगले ओळखत असत. ग्राहकाने खिशातून नोट काढायची, पानवाल्याला द्यायची. तो ते आधीच बांधून ठेवलेले पुडके लागलीच द्यायचा. सोबत उरलेले सुटे पैसे . कधी कधी काही ग्राहक दिवसभराची सोय करून ठेवावी म्हणून जास्तीच्या दोनचार पुड्या आपल्या खिशात ठेवायचे. इतकी समंजस माणसे पाहून मला आपला देश सुधारू लागला असे उगीच वाटायचे.

मग त्या पानवाल्याचे ते आदरणीय ग्राहक किंवा तो ग्राहकराजा आपल्या गाडीवर आरूढ होण्यापूर्वी ती दिलेली पुडी व्यवस्थित सोडून आपल्या तोंडात रिकामी करायचा.  मग त्याच्या तोंडात एका बाजूला छानपैकी फुगा यायचा. चेहेऱ्यावर समाधानाचे, तृप्ततेचे भाव यायचे. त्या तृप्त अवस्थेत आपला मुखरस तोंडात साठवत, तो आपल्या गाडीला किक मारायचा. मग ती गाडीसुद्धा समाधानाने मार्गस्थ व्हायची. एखादी फोरव्हीलर थांबायची. तिचा चालकही गायछाप किंवा तसलेच काही तरी घ्यायचा. हातावर घेऊन त्यावर बोटाने किंवा बोटाच्या नखाने घेतलेला चुना मळत ते मिश्रण पुरेसे एकजीव झाले की बोटाच्या चिमटीत ती पूड घेऊन अत्यंत पद्धतशीरपणे आपल्या तोंडात एका बाजूला व्यवस्थित ठेवायचा. केवढी ही शिस्त..! मग गाडीत बसायचा, आणि ती फोरव्हीलर कोणतीही तक्रार न करता सुरु व्हायची. आणि ते समाधानी जीव मार्गस्थ व्हायचे. ( सध्या गुटखा खाण्यावर बंदी असली तरी गावोगावचे पानवाले आपल्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून चोरूनलपून का होईना पण त्यांची ही हौस पुरवतात हा भाग वेगळा. )

खूप दिवस माझा असा समज झाला होता की तोंडामध्ये बार असल्याशिवाय किंवा एका बाजूला गाल फुगलेला असल्याशिवाय कोणतेही वाहन सुरु होत नाही. ते वाहन नीट चालायचे असेल तर तुमच्या तोंडामध्ये बार हा असलाच पाहिजे. त्या पानटपरी जवळची भिंत लाल पिवळ्या तपकिरी रंगात रंगलेली होती. त्या पान टपरीवाल्याच्या उदार ग्राहकांनी त्याला त्या भिंत रंगवण्याचा कोणताही खर्च येऊ नये या उदात्त हेतूने आपल्या पाझरलेल्या मुखरसाने ती आधीच रंगवून ठेवली होती. पुढे मी जसजसा मोठा होत गेलो, तसतसे मला कळू लागले की कुठेही आपल्या मुखरसाची बरसात करायची नाही. त्यासाठी एखादा कोपरा शोधायचा आणि मगच ते सत्कृत्य करायचे. या चांगल्या सवयीमुळे सरकारी कार्यालये, वाचनालय इतकेच काय पण शाळांचे कोपरे, सार्वजनिक स्वच्छतालये इ चे कोपरे लोकांनी रंगवलेले होते. इतरत्र कुठेही त्यांनी आपल्या मुखरसाची बरसात केली नव्हती.

पण काही हुशार लोकांनी इमारतींच्या कोपऱ्यात देवाच्या चित्रांच्या टाईल्स बसवून अशा लोकांची फार पंचाईत केली होती. आणि त्या बिचाऱ्यांना कुठे बोलताही येत नव्हते. सगळा तोंड दाबून बुक्क्याचा मार . त्यांना काही पर्याय द्यायला नको का ? बरं सगळीकडे लिहून ठेवलंय ' येथे थुंकू नका. ' पण मग थुंकायचे तरी कुठे ? आणि आता तर काय म्हणे मायबाप सरकारने त्याच्यावर दंडच लावलाय . काय करायचं बिचाऱ्यांनी  ! परदेशात म्हणे खूप स्वच्छता असते. कोणी कागदाचा कपटा सुद्धा रस्त्यावर टाकत नाही. मग थुंकणे तर दूरची गोष्ट ! पण जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात केवढे हे स्वातंत्र्य..!

आम्ही कधी शहाणे होणार ? शिकलेल्यांची आणि न शिकलेल्यांची परिस्थिती सारखीच. आणि आता तर करोनासारख्या घातक विषाणूने जगभर थैमान घातले आहे. रोज करोनाबाधितांची संख्या वाढते आहे. करोनाचे विषाणू रोग्याच्या थुंकीमार्फत वातावरणात पसरतात. ते तुमच्या आमच्या श्वासात हवेतून गेले की आपल्यालाही त्यांचा संसर्ग होऊ शकतो. म्हणून आता बदलायला हवे. कोणत्याही बदलाची सुरुवात ही स्वतःपासून होत असते.  आपले वैयक्तिक आणि सार्वजनिक आरोग्य सांभाळायचे तर स्वच्छतेला आणि चांगल्या सवयींना पर्याय नाही.

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
            ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...