मुख्य सामग्रीवर वगळा

एक संधी खुणावतेय तुम्हाला..

उगवतीचे रंग

एक संधी खुणावतेय तुम्हाला..

माझ्या प्रिय मित्रांनो,

२०२० सालचा हा मार्च महिना जगाच्या इतिहासात आपली नोंद कायम स्वरूपी अतिशय वेगळी करून ठेवणार आहे. ती म्हणजे संपूर्ण जगभर पसरलेली कोरोनाची साथ आणि तिने घेतलेले बळी . आपल्यावर सतत त्याच बातम्यांचा सध्या भडीमार होतोय. कोणतेही टी व्ही चॅनल लावा, त्याच्याशिवाय दुसरी बातमी नाही. इंटरनेटची सगळी माध्यमं तोच तो भडीमार तुमच्या माझ्यावर करीत आहेत. कोणालाही फोन लावताना त्याच त्या सूचना आपल्या कानावर पडत आहेत. मित्रांनो, आपण सगळे एका विशिष्ट मानसिक अवस्थेतून जात आहोत. ज्याची आपल्याला सवय नाही.

आता तर शाळा, कॉलेज, सिनेमागृहे, मॉल्स, बगीचे, मंदिरे सगळे काही बंद झालेत. जिथे अजून झाले नसतील तिथे ते लवकरच होतील. बऱ्याचशा कार्यालयांचे कर्मचारी घरून काम करणार आहेत. त्यासाठी ' वर्क फ्रॉम होम ' हा परवलीचा शब्द झालाय. घरातले सगळे सदस्य मग ती शाळेत जाणारी मुले असॊत वा कामावर जाणारी माणसे, विरंगुळा म्हणून बाहेर जाणारी घरातील वृद्ध माणसे हे सगळे घरात असतील. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपल्याला अगदी काही अत्यावश्यक कामे सोडली तर २४ तास घरातच बसायचे आहे.
अशा वेळी नित्याची सवय म्हणून तुम्ही टीव्ही लावताय. तर तुम्हाला त्याच त्या बातम्या दिसतील. त्या तुमची काळजी वाढवतील. व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर सगळीकडे तोच विषय. अशा वेळी आपण अस्वस्थ होणे हे साहजिक आहे. घरात बसून नैराश्यही येऊ शकतं .

सतत काहीतरी करण्याची सवय लागलेल्या आपल्या मनाला आणि शरीराला हा नवीन बदल खूप भारी पडू शकतो. म्हणूनच हे संकट न मानता एक संधी माना . ही संधी तुमचं दार ठोठावतेय. ही काळानं दिलेली आपल्याला एक संधी आहे. ही संधी आहे ' स्व ' शी संवाद करण्याची. आतापर्यंत कधी बोललोय का आपण स्वतःशी. आपण जगातल्या सगळ्या माणसांशी बोलतो. पण एका खास व्यक्तीशी बोलणं नेहमीच राहून जातं . ही खास व्यक्ती आपण स्वतः. आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या काळात हा स्वतःशी संवाद खूप महत्वाचा आहे. अशा वेळी मला तुकोबांच्या ' वृक्ष वल्ली आम्हां सोयरे वनचरे..' या अभंगातील काही ओळी आठवताहेत.
तुकोबा म्हणतात

येणे सुखे रुचे एकांताचा वास
नाही गुणदोष अंगा येत
.
याच अभंगात पुढे ते म्हणतात -

तुका म्हणे होय मनाशी संवाद,
आपुलाची वाद आपणाशी ...

हा आपल्या मनाशी वाद, संवाद होऊ द्या. दिवसातून काही वेळ तरी स्वतःशी बोला. ज्यांना सतत काळजी करण्याची सवय असते, त्यांच्यासाठी तर ही गोष्ट अत्यावश्यक आहे. ध्यानाबद्दलची माहिती, त्याचे फायदे हे सगळे आपण ऐकून असतो. कधी काळी कुठल्या तरी ध्यान शिबिराला सुद्धा गेलेलो असू. पण रोजच्या धावपळीच्या जीवनात ते करायला वेळ झाला नाही. किंवा आपण त्याचा कंटाळा केला. पण आता संधीही आहे आणि वेळही आहे.

कदाचित हे दोन आठवडे आपल्यासाठी खूप वेगळे ठरतील. या कालावधीचा योग्य वापर केला तर आपल्यासाठी ते नवसंजीवनी देणारे सुद्धा ठरू शकतील. तुम्हाला माहितीच असेल की ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा होम केला, अशा सर्व मंडळींना आपल्या आयुष्यातला काही काळ हा तुरुंगवासातल्या एकांतात काढावा लागला आहे. सावरकरांना ज्या अंदमानच्या तुरुंगात ठेवले होते, तेथे त्यांच्या जागी दुसरी कुणी व्यक्ती असती, तर तिला वेड लागले असते. पण सावरकरांनी या काळात मनन , चिंतन केले. तुरुंगातील भिंतीवर कविता लिहिल्या. त्या पाठ करून नंतर पुन्हा लिहून काढल्या. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात ' गीतारहस्य ' नावाचा अजरामर ग्रंथ लिहिला. अहमदनगरच्या तुरुंगात असताना पंडित नेहरूंनी ' डिस्कव्हरी ऑफ इंडिया ' हा ग्रंथ लिहिला. तुरुंगातच विनोबांची ' गीता प्रवचने ' जन्माला आली. मी ही सगळी उदाहरणे या साठी सांगितली की या साऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या एकांताचा, वेळेचा किती सुंदर सदुपयोग केला.

मान्य आहे, आपण नाही विनोबा, आपण नाही सावरकर. पण ठीक आहे ना. काही ना काहीतरी तर करूच शकतो ना आपण ! तुमच्या घरातील कपाटात तुम्ही कधी काळी विकत घेतलेली किंवा तुम्हाला मिळालेली काही पुस्तके असतील. ती वाचायची हीच योग्य वेळ आहे. ज्ञानेश्वरी, दासबोध, भगवद्गीता यासारखे ग्रंथही पडून असतील, तर तेही वाचायला सुरुवात करता येईल.

आणि हो, आपल्या घरातील मुलांशी , वृद्ध माणसांशी कधी आपण मनसोक्त गप्पा मारल्या नसतील, तर त्या मारण्याची संधी सुद्धा तुम्हाला आता आहे. कधी घर आवरायला वेळ मिळाला नसेल, तो आता मिळेल. मस्त छानपैकी घर लावा. छान गाणी लावा. त्यांचा आनंद घ्या. आणि गाणी मोबाईलला हेडफोन लावून ऐकण्याऐवजी दुसऱ्या कुठल्या तरी साधनावर ऐका. त्यांचा आनंद घेऊन पहा.
मोबाईल काही काळ बाजूलाच ठेवा. अशा खूप काही गोष्टी करता येतील. म्हणून म्हटलं हे दोन आठवडे किंवा अजून जो काही वेळ मिळेल, त्याचा सदुपयोग करून आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य बळकट करू या. संधी दार ठोठावतेय. दार उघडा .. बाहेरचे दरवाजे बंद करून मनाचे दरवाजे उघडा .

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
  ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...