उगवतीचे रंग
जास्तीचे देऊन टाका ...
पैसा , रूप, ताकद, बुद्धी या सारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर मिळणे ही भाग्याचीच गोष्ट. पैशासारख्या काही गोष्टी वारशाने मिळतात. तर काही मिळवाव्या लागतात. रूप किंवा सौंदर्य ही मिळालेली देणगी असते, पण ती टिकवणे आपल्या हातात असते. तशीच ताकदही मिळवावी लागते आणि टिकवावी लागते. पण यातील कुठलीही गोष्ट डोक्यात गेली की मग माणसाला गर्व होतो. त्याची परिणीती दुसऱ्याला तुच्छ लेखण्यात होते. आणि मग अशा अहंकारी माणसाला लोक टाळू लागतात.
धनवान माणसाचा पैसा जेव्हा सत्कारणी लागतो, तेव्हा समाजासाठी दानशूरतेचा एक आदर्श तो निर्माण करत असतो. टाटा, बिर्ला, नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी असे आदर्श निर्माण केले आहेत. प्रख्यात उद्योगपती घनश्याम दास बिर्ला यांची एक गोष्ट आहे. एकदा त्यांना कोणीतरी विचारले की तुमचे एवढे उद्योगधंदे आहेत, त्यात भरपूर लोकांना काम मिळते. त्यांच्या पोटापाण्याची सोय होते. ही तुम्ही एक प्रकारची समाजसेवाच करता. मग ठिकठिकाणी प्रचंड पैसा खर्चून तुम्ही मंदिरे का उभारता ?
या प्रश्नावर बिर्लाजींनी छान उत्तर दिले. ते म्हणाले, " आपल्या देशात हजारो लोक अशिक्षित, अडाणी आणि गरीब लोक आहेत. देवाधर्मावर त्यांची श्रद्धा आहे. त्यांना माथा टेकण्यासाठी कुठेतरी जागा नको का ? परमेश्वरापुढे डोके टेकल्याने जर त्यांना काही समाधान वाटत असेल, तर ते त्यांना मी का देऊ नये ? पण मला वाईट या गोष्टीचे वाटते की मी इतकी सुंदर मंदिरे उभारली, त्यात भगवंताच्या सुंदर मूर्ती उभ्या केल्या , तर त्यांच्याकडे डोळे भरून पाहण्याऐवजी लोक डोळे मिटून भगवंताकडे आपल्या मागण्या करतात आणि नवस करतात. भगवंत दर्शनाचा आनंद घेणारे फार कमी. मागणाऱ्यांचीच गर्दी जास्त.
पण नंतर बिर्लाजींनी त्या प्रश्न विचारण्यालाच एक प्रश्न विचारला. ' समजा , तू एका नावेतून प्रवास करतो आहेस, आणि त्या नावेच्या तळाला भोक पडले आणि त्या नावेत पाणी शिरू लागले तर काय होईल ? '
' ती नाव बुडेल.'
' मग अशा वेळी तू काय करशील ? '
' ती नाव बुडू नये म्हणून जेवढे पाणी बाहेर फेकता येईल तेवढे फेकण्याचा प्रयत्न करेल. '
बिर्लाजी म्हणाले, ' पैशाचेही असेच आहे. आवश्यक तेवढा पैसा झाला की जास्तीचा पैसा लोकांना वाटून टाकला पाहिजे. यासाठीच मी मंदिरे उभारतो. समाजसेवेचे प्रकल्प हाती घेतो. आपण समाजाकडून जे घेतो, ते समाजाला परत दिले पाहिजे. जास्तीचा पैसा मुलाबाळांसाठी ठेवला तर ती वाममार्गाला लागण्याची, व्यसनी होण्याची शक्यता असते. साचलेले पाणी आरोग्याला घातक असते. वाहते पाणी आरोग्यदायी असते. '
बिर्लाजींचे हे विचार आजही मननीय आहेत. आपण समाजाचे काही तरी देणं लागत असतो. त्यामुळे आपल्याकडे जे काही असते, त्यात समाजाचाही हिस्सा असतोच. तो काही अंशाने तरी परत करता आला पाहिजे. आपल्याकडे असणाऱ्या पैसा, शक्ती, सौंदर्य, बुद्धी या गोष्टींचा उपयोग दुसऱ्यासाठी सुद्धा झाला पाहिजे. नावेतील पाण्याचे उदाहरण मोठे छान आहे. नावेतील शिरलेले जास्तीचे पाणी जसे काढून टाकावे लागते, तसेच या सगळ्या गोष्टींचे आहे. त्या असणे ही चांगली गोष्ट. पण
त्यांची हवा एकदा डोक्यात गेली की मग माणसाचा माणूस राहत नाही.
प्रसिद्ध अभिनेता सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचं मला त्यांच्या वागण्याबद्दल नेहमी कौतुक वाटत आले आहे. अमिताभ सारखी लोकप्रियता क्वचितच कोणा दुसऱ्या नटाच्या वाट्याला आली असेल. त्याला मिळालेला पैसा, लोकप्रियता याची जराही हवा त्यांच्या डोक्यात गेलेली दिसत नाही. पाय जमिनीवर आहेत. आपण त्यांना अनेक सामाजिक कार्यक्रमात किंवा टी व्ही वरील ' कौन बनेगा करोडपती ' सारख्या शो मध्ये पा
हिले आहे. समोरची व्यक्ती कशीही असो, त्या व्यक्तीशी अमिताभ ज्या आदराने बोलतो , ते पाहून खरंच त्याच्याबद्दलचा आदर दुणावतो.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा