मुख्य सामग्रीवर वगळा

माणसाची पारख ..

उगवतीचे रंग 

माणसाची पारख .. 

लीळाचरित्रात एक कथा आहे. एक साधुपुरुष फिरत फिरत एका गावात येतो. त्या गावातील एका गरीब माणसाच्या घरी तो थांबतो. त्या घरातील स्त्री त्याची सेवा करते. त्याला बसायला पाट देते. पाय धुते. गरमागरम जेवण करून त्याला खाऊ घालते. तो तिच्या सेवेवर प्रसन्न होतो. रात्री झोपताना तो सांगतो की तुझ्या घरात असलेल्या सगळ्या लोखंडाच्या वस्तू माझ्या बिछान्याजवळ आणून ठेव. त्या स्त्रीचा नवरा शेतकरी असतो. त्यामुळे त्यांच्या घरात सगळी शेतीची अवजारे असतात. कुदळ , पावडे, विळा ,कुऱ्हाड , नांगर इ. या सगळ्या वस्तू एकत्र करून ती त्या साधुमहाराजांजवळ आणून ठेवते. भल्या पहाटे  साधुमहाराज उठून आपल्या पुढील प्रवासाला निघून जातात. 

त्या स्त्रीचा नवरा ती शेतीची अवजारे घेऊन शेतावर जातो. नांगर चालवायला लागतो तर नांगराचा फाळ वाकतो. कुऱ्हाडीने झाडे तोडण्यास जातो तो कुऱ्हाडही चालत नाही. विळ्याचीही तीच अवस्था झालेली असते. शेवटी तो सगळी अवजारे घेऊन घरी येतो. आणि बायकोला सांगतो की काल तू ज्या साधूला आपल्या घरी ठेवून घेतलेस, त्याने आपल्याला फसवले. आपल्या सोन्यासारख्या वस्तू आता निरुपयोगी झाल्या आहेत. तोवर चांगले उजाडलेले असते. त्याची बायको निरखून पाहते तर तिला त्या वस्तू पिवळ्या रंगात चमकत असताना दिसतात. त्यांचे रूपांतर सोन्यात झाले आहे हे तिच्या लक्षात येते. मग ती आपल्या नवऱ्याला सत्य परिस्थिती समजून सांगते.ती सांगते त्या माणसाने आपल्याला फसवले नाही, तर आपले जन्मोजन्मीचे कल्याण केले आहे. 

बऱ्याच वेळेला आपलेही असे होते. आपण फक्त वरवर बघतो. एखादी घटना जाणून घ्यायची असेल, तिचे मूल्यमापन करायचे असेल किंवा एखादया व्यक्तीविषयी मत बनवायचे असेल, तर फक्त वरवर पाहून चालणार नाही. घटनेच्या मुळाशी जावे लागेल. त्या व्यक्तीलाही समजून  घ्यावे लागेल. घाईघाईने निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. लोखंडाच्या अवजारांनीच शेती करता येते. सोन्याच्या अवजारांनी शेती करता येत नाही. पण सोन्याची अवजारे झाली असतील तर त्यातली काही विकून आपण हवी तेवढी लोखंडी अवजारे घेऊ शकतो आणि उत्तम शेती करू शकतो. तसेच तात्पुरता विचार न करता एखाद्या घटनेचे दूरगामी परिणाम काय होतील याचाही विचार व्हायला हवा. फक्त जवळचे पाहून चालणार नाही. 


पण आपण ही गोष्ट समजून घेतली नाही तर मित्रालाही आपण शत्रू समजायला लागू. तो गरीब माणूस त्याच्या वस्तू सोन्याच्या झाल्या हे ओळखू शकला नाही. त्याचे हित करणाऱ्याला तो ओळखू शकला नाही. उलट त्या साधू पुरुषाला तो दोष देऊ लागला. बरेचदा आपल्या हिताची गोष्ट आपल्याला कटू वाटते. ती आपल्याला सांगणारा आपला शत्रू वाटू लागतो. आणि गोड गोड बोलून भुलवणारी एखादी व्यक्ती आपल्याला मित्र वाटू लागते.त्या गोड बोलणाऱ्या व्यक्तीचा उद्देश मात्र वेगळा असू शकतो. 

( कृपया या गोष्टीचा सध्याच्या राजकीय परिस्थितीशी संबंध जोडू नये. ) 

                 ©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
                            ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...